#राज्यव्यवहारकोश' किंवा राजकोष हा ग्रंथ आजवर रघुनाथपंडित (रघुनाथ नारायण हणमंते) यांनी रचलेला आहे असे समजले जात होते आणि त्याची रचना शिवराज्याभिषेकानंतर, इ. स. १६७७-७८ च्या सुमारास शिवाज्ञेने रघुनाथपंडितांनी केली आहे, असे मानले जात होते. परंतु अलीकडे ख्यातनाम संशोधक डॉ. माणिकराव धनपलवार यांनी या ग्रंथाचा कर्ता आणि रचनाकाळ यांचा निर्णय सप्रमाण केला आहे. या ग्रंथाचा कर्ता धुंडिराज लक्ष्मण व्यास हा असून, तो तंजावरचा राजा शहाजी ( इ. स. १६८४-१७१०) यांचा आश्रित होता. त्याने अनेक उत्तमोत्तम ग्रंथांची रचना केलेली आहे. रघुनाथपंडित हे शहाजीराजांच्या काळापासून दक्षिणेतील मराठा सत्तेचे मुत्सद्दी म्हणून वावरणारे विद्वान् होते; शिवाजीराजांनी हे कार्य त्यांच्याकडे सोपवले असले, तरी राजकीय कार्याच्या व्यवधानात त्यांना ते शक्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या संबंधातील समर्थ कविपंडिताकडे धुंडिराज व्यासांकडे त्याची जबाबदारी सोपवली. धुंडिराज व्यासाने हे जिकिरीचे कोशरचनाकार्य पुरे केले, परंतु ते शिवकाळात नव्हे, तर तंजावर नृपती शहाजीच्या राज्यकाळात, म्हणजे १६८४ नंतर केव्हा तरी या वेळी शिवछत्रपती आणि रघुनाथपंडित हे दोघेही प्रेरक पुरुष हयात नव्हते. “ इति श्री शिवच्छत्रपतिप्रियामायेन नारायणाध्वरिसूनुना रघु नाथपण्डितेन शिवराजनियोगतः कृते राजव्यवहारकोशे पण्यवर्गो दशमः समाप्तः । शके १६४७ विश्वावसौ फाल्गुन कृष्ण १४ चंद्रे समाप्तम् ।। यावरून हा ग्रंथ इ. स. १७२५ मधे लिहिला आहे हे स्पष्ट आहे. ग्रंथकाराने या दोघांविषयी रघुनाथपंडिताच्या भूमिकेतूनच गौरवापर श्लोक या ग्रंथात लिहिलेले आहेत. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांचा आणि त्यांच्या कुळांचा गौरव गाणाऱ्या या कवीने, खास कुळकीर्तीची पार्श्वभूमी उभी करण्याचा प्रसंग असूनही भोसले कुळाचा संबंध राजस्थानातील सिसोदिया रजपुतांशी असल्याचे चुकूनही सूचित केले नाही, हे आपण गंभीरपणे ध्यानीं घ्यायला हवे. ... क्रमश !! ..... अमर दांगट
.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा